⁠  ⁠

‘बाराखडी’ आता झाली ‘चौदाखडी’

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पहिलीपासून शिकवल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील बाराखडी व वर्णमालेत बदल केला असून आता यापुढे मुलांना बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जाणार आहे. मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत ‘अॅ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीतील काही विद्यार्थ्यांना अजूनही वाचता येत नसल्याचे विविध संस्थांचे सर्वेक्षण आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. त्यातच मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे काही नवीन नियमही तयार करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्या प्राधिकरणाने विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत शंभर टक्के वाचता येईल, याची हमी देणारा ‘मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम’ तयार केला आहे.त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सर्व शाळांत हा कार्यक्रम करण्यात येत आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील तीन दिवसांचे प्रशिक्षण प्राथमिक शिक्षकांना देण्यात आले आहे. या मूलभूत वाचन विकास कृती कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आदर्श वाचन करता यावे असा आहे. वाचन करताना विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अर्धचंद्र, अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी असणारे काही जोडशब्द अवघड वाटतात. अशा विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवण्याची कृती या चौदाखडीमध्ये असणार आहे. सध्या एक वर्षासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

असा असेल चौदाखडी स्वरमालेचा क्रम
‘अ’ ते ‘औ’च्या बाराखडीत आता दोन नव्या स्वरांची भर घालण्यात आली आहे. सध्याच्या क्रमानुसारच्या ‘ओ’ स्वरानंतर ‘ऑ’ हा नवा स्वर येईल. त्यानंतर ‘औ’ हा स्वर येईल. ‘ए’ स्वरानंतर ‘अॅ’ या नव्या स्वराचा क्रम असेल आणि त्यानंतर ‘ऐ’ हा स्वर येईल.

Share This Article