⁠  ⁠

गोष्ट संघर्षाची..गोष्ट शेतकऱ्याच्या लेकीची ; वाचा नायब तहसीलदार सोनाली यांची यशोगाथा!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : सातत्याने येणारे अपयश पण…’मी अधिकारी होणारच’ हा निश्चय स्वप्नांना बळ देण्यासाठी महत्त्वाचा असतो. सोनालीचा जन्म लहानशा शेतकरी कुटुंबात झाला. तिचे आई – वडील दोघेही शेतीकाम करायचे. ग्रामीण भाग असल्याने शैक्षणिक वातावरण असे काही नव्हते. पण सोनाली लहानपणापासून हुशार होती.

त्यामुळे काही काळाने घरातील शिक्षणासाठीचे नकारात्मक वातावरण हे थोडेसे सकारात्मक झाले. प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर आंतरभारती विद्यालयातून माध्यमिक शिक्षण झाले. सातवीत असतानाच कुर्डुवाडी येथे प्रांताधिकारी म्हणून नयना मुंडे कार्यरत होत्या. त्यांच्या कामाबद्दल व स्पर्धा परीक्षेबद्दल शिक्षकांनी वर्गात माहिती दिली. त्यामुळे तिला वाटू लागले की आपणही या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणून तिने आधीपासून खूप अभ्यास केला‌. दहावीच्या परीक्षेत देखील प्रथम आली.

तिला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचे होते. पण वडिलांनी मुक्त विद्यापीठातून शिक…बी.एड कर वगैरे सल्ला दिला याच वर्षे देखील वाया गेले आणि प्रवेश पण मिळाला नाही. याकाळात आमदार बबनराव शिंदे यांचे कुर्डूवाडीत बीएससीचे महाविद्यालय सुरू झाले. तेथून बीएससी शिक्षण पूर्ण केले. नंतर ते महाविद्यालय बंद झाले‌. जर ते महाविद्यालय सुरू झाले नसते तर तिचे शिक्षण तिथेच बंद झाले असते. पुढे तिने ठरवले की आता काही झाले तरी शिक्षण सोडायचे नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायची आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे. यातही संयमाची परीक्षा होतीच…जवळपास सहावेळा मुख्य परीक्षा दिल्या व तीन वेळा मुलाखत दिली.

सातत्याने अपयश येत असताना, संयम बाळगून, प्रयत्न करत राहिले. त्यामुळेच यशाला देखील हार मानावी लागली. अखेर, सहाव्या प्रयत्नात नायब तहसीलदारपदी निवड झाली. निवड झाली पण जॉयर्निंग मिळत नव्हती कारण‌ तो कोरोनाचा काळ होता. यात तिच्या जवळचे अगदी घरातील दहाजण असे बरेचजण हक्काचे सोडून गेले.पण तिचा सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहण्याचा प्रयत्न हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Share This Article