राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये १०१५ सेविका आणि ३९२८ मदतनीस अशा एकूण ४९४३ जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या या भरतीसाठी २० जुलैपासून अर्ज स्वीकारले जात असून, ३१ जुलै ही अंतिम मुदत असणार आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार महिला किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. अर्जदारांचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
विधवा महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्जदार महिला ही संबंधित नगर परिषद, नगर पंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार मानधन दिले जाईल.
यात अंगणवाडी सेविकांना १३ हजार तर अंगणवाडी मदतनिसांना ७५०० रुपये महिना पगार दिला जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील इच्छुक व पात्र महिलांनी ३१ जुलैपूर्वी आपले अर्ज योग्य कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रक्रिया: उमेदवारांची निवड १०० गुणांच्या निकषावर आधारित असेल. यामध्ये शैक्षणिक गुण आणि अतिरिक्त गुणांचे विभाजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता (कमाल ८० गुण) : बारावी, पदवी, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड. आणि एमएससीआयटी किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्रांच्या गुणांच्या आधारे ८० गुण दिले जातील.
अतिरिक्त गुण (कमाल २० गुण) : विधवा/अनाथ महिलांसाठी दहावी गुण, अनुसूचित जाती/जमातीसाठी ५ गुण, इतर मागासवर्गीय, इतर प्रवर्गांसाठी ३ गुण, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदाचा २ वर्षांचा अनुभव असल्यास ५ गुण राखीव ठेवले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
अर्जासोबत शैक्षणिक गुणपत्रकांची सत्यप्रत जोडणे बंधनकारक आहे. याशिवाय स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून एक कागदपत्र आणि स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच शिधापत्रिका, डोमिसाइल प्रमाणपत्र (तहसीलदार) / रहिवासी प्रमाणपत्र (तलाठी) जन्म दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र (वयाच्या पुराव्यासाठी) आवश्यक आहे.









