महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण तरुणी बघतात. त्यासाठी अहोरात्र अभ्यास करतात. दरम्यान आयोगाने राज्यातील परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे परीक्षेचा पॅटर्न सन २०२५ पासून बदलला असून आता एमपीएससीची परीक्षा यूपीएससीप्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या परीक्षेसंदर्भात इतर महत्वाची माहिती त्यांनी सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली.
एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. महाराष्ट्रातील विद्यार्थी हा यूपीएससी सोबत एमपीएससीची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात मोठ्या प्रमाणात भर्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून ‘एमपीएससी’च्या पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.