⁠  ⁠

आनंद अन् दु:ख सोबतच आले वाट्याला… हलाखीच्या परिस्थितीशी मात करत ओम बनला PSI !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती बेताची…आई-वडिलांनी कष्ट उपसून चार मुलांना वाढविले.पण कधी कसलीच कमी पडू दिली नाही.चार मुलांची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे ओमचे आई-वडील राबराब राबले. कडाक्याच्या थंडीत स्थलांतर करत बागायतदार जिल्ह्यांत ऊसतोडीच्या कामाला जाऊन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. अशा परिस्थितीत देखील ओम भागवत आघाव पोलीस उपनिरीक्षक झाला आणि त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

मराठवाड्यातील बीड हा राज्यातील दुष्काळी जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो.ओम हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी या लहानशा गावात राहणारा रहिवासी. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले. ओमने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला पुढचे शिक्षण द्यायचे म्हणून वडील दिवंगत भागवत आघाव यांनी पत्नीला घेऊन थेट गुजरात गाठले. तेथे कारखान्यावर रोजंदारीने काम करून दोन पैसे जास्त पदरात पडतील, या आशेने कष्ट उपसले. ओमला उच्च शिक्षित केले. हे सर्व ओम त्याच्या डोळ्यांनी बघत होता. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. बारावी उत्तीर्ण केली आणि पोलिस भरतीची जाहिरात वाचण्यात आली. त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अर्ज भरला अन् शिपाई म्हणून नोकरीही मिळाली. पण एवढयावर थांबून चालणार नाही तर अधिकारी पद गाठले पाहिजे हा विचार मनाशी बाळगून त्याने अभ्यासाला सुरुवात केली.

२०१६ साली ओम पोलिस दलात भरती झाला. त्याचवर्षी वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि ओमसह संपूर्ण कुटुंबावर आभाळ फाटले. या आघाताने तोदेखील खचला. मात्र, पुन्हा जिद्दीने पेटून उठला आणि संघर्षावर विजय मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

Share This Article