---Advertisement---

सलग तीनदा एका गुणाने यश हुकले, पण निराश झालो नाही

By Mission MPSC

Updated On:

Bhushan-Ahire-MPSC-topper
---Advertisement---

 

जळगाव – राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेमध्ये कुणीही पदवीधर युवक यशस्वी होऊ शकतो, अशा आशयाचा अभ्यासक्रम आहे. पण अनेक जण दीड-दोन वर्षे अभ्यास करतात. परीक्षेत अपयश आले तर एमपीएससीचा मार्ग सोडून देतात. मला स्वत:ला २०१२ ते २०१४ असे सलग तीनदा केवळ एका गुणाने यश मिळू शकले नाही.. पण मी हा मार्ग सोडला नाही… उपजिल्हाधिकारी किंवा उपविभगीय पोलीस अधिकारी व्हायचेच म्हणून अभ्यासात सातत्य ठेवले आणि अखेर यश मिळालेच, असे एमपीएससीच्या परीक्षेत (मार्च २०१७) राज्यात प्रथम आलेल्या भूषण अहिरे यांनी सांगितले.

अहिरे हे शहरात एका सत्कार सोहळ्यासाठी आले असता त्यांनी .. भेटी दिली. धरणगाव येथील सुनिल चौधरी, सागर पाटील, शरदकुमार बन्सी हे देखील होते. यावेळी अहिरे यांनी एमपीएससी परीक्षेत मिळविलेल्या यशाचे सूत्र, अभ्यासाची तयारी याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. हा प्रश्‍नोत्तर स्वरुपातील संवाद असा….

प्रश्‍न – अभियांत्रिकीकडून स्पर्धा परीक्षेकडे आपण कसे वळलात?
भूषण अहिर – घरातून पूर्ण पाठबळ होते. घरची परिस्थिती चांगली आहे. वडील अशोक अहिरे व आई सुनिता अहिरे हे दोघे शिक्षक आहे. आम्ही मुळचे गोराणे, ता.सटाणा येथील आहोत. पण नोकरीनिमित्त कुटुंबीय नाशकात स्थायिक झाले. नाशिकच्या एमईटी संस्थेत अभियांत्रिकीची पदवी घेताना (माहिती तंत्रज्ञान) या संस्थेत भारतीय पोलीस सेवा, प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांचे विचार ऐकायला मिळाले. तेव्हापासून स्पर्धा परीक्षांची गोडी लागली, त्याविषयीचे आकर्षण वाढले.

प्रश्‍न – आपल्या यशाचे रहस्य काय?
भूषण अहिरे – अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कुठल्याही विषयाची अडचण आली नाही. कुणीही पदवीधर विद्यार्थी यश मिळवू शकतो, असा राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम आहे. फक्त अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे. पुणे येथे अभ्यासाची तयारी केली. दररोज किमान ११ तास अभ्यास करायचो. दर अडीच तासांनी काही वेळ अभ्यास थांबवायचो… नंतर पुन्हा वाचन करायचो…

प्रश्‍न -उपजिल्हाधिकारी म्हणून आपण शासकीय सेवेत येणार आहात, कुठल्या विषयाला प्राधान्य देणार?
भूषण अहिरे – येत्या १ ऑगस्टपासून माझे यशदा (पुणे) येथे प्रशिक्षण सुरु होईल, तेथील प्रशिक्षणानंतर मी शासकीय सेवेसाठी दाखल होईल. उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहताना ज्या शासकीय योजना आहेत त्या व्यवस्थितपणे ग्रामस्थ, शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही, याकडे कटाक्ष असेल. १०० टक्के लाभार्थींना लाभ व्हायलाच हवा, या दृष्टीने काम करील. जलयुक्त शिवार अभियान व डिजीटल इंडिया या मोहिमेत माझे अधिकचे योगदान कसे देता येईल, यावर भर राहिल.

साडेचार वर्षे सतत प्रयत्न केले
२०१२ मध्ये अभियांत्रिकी पदवीचे शेवटचे वर्ष असताना तयारी सुरु केली. नंतरचे तीन वर्षे केवळ एका गुणाने यश मिळू शकले नाही. २०१४ मध्ये मंत्रालयात कक्ष अधिकारीपदाची नोकरी मिळाली. पण मी रुजु झालो नाही. उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय पोलीस अधिकारीच व्हायचे, असे ठरविले होते. साडेचार वर्षे मी सतत प्रयत्न केले.

तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे
आपण अधिकारी आहोत, त्या पदाला पूर्ण न्याय देऊ शकतो, असा आत्मविश्‍वास असावा. अलीकडे व्यसनाधीनता युवकांमध्ये अधिक आहे. ती दूर व्हावी… जिद्द, सोबतच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत, असे मतही भूषण अहिरे यांनी व्यक्त केले.

सौजन्य – लोकमत

अपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now