⁠  ⁠

अवघ्या पंचवीसाव्या वर्षी माथाडी कामगाराचा लेक बनला उपजिल्हाधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story समाधान घुटुकडे याची लहानपणापासून जडणघडण ही सांगोला तालुक्यातील घेरडी या दुष्काळग्रस्त भागातून झाली. या भागात कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने समाधानचे आई – वडील आपल्या कुटुंबाला घेऊन नोकरीच्या शोधात मुंबईला आले. त्यानंतर ते माथाडी कामगार म्हणून चेंबूर येथे काम करू लागले. त्यातून मिळालेल्या रोजगारातून आपला संसारगाडा चालवत. पण मुलांचा चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते कष्ट घेत.आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या हिंमतीवर उभे रहावे ही त्यांची प्रांजळ अपेक्षा होती. मुलाने देखील ती पूर्ण केली आणि जिद्दीने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली.

समाधान याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मानखुर्द मुंबई येथे झाले. तर मोहिते पाटील विद्यालय येथे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. नंतर त्याने मॅकॅनिकल हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला.लहानपणापासून वर्गात हुशार विद्यार्थी असल्याने, त्याला स्पर्धा परीक्षेचे आकर्षण होता. पदवीच्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

एकीकडे अभियांत्रिकीचा अभ्यास तर दुसरीकडे त्यातून वेळ मिळाला की एमपीएससीचा असा दिनक्रम सुरू होता. हातात कोणतीही पदवी नव्हती, परंतू त्याने अनुभव घेण्यासाठी एमपीएससीच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. कारण, त्याने गावाकडची परिस्थिती जवळून बघितली होती. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयाचा सातत्याने संबंध यायचा. त्यावेळी एकेक कागद काढण्यासाठी दिवस जात असायचा. लोकांची होणारी तारांबळ दिसायची. काम न झाल्याने हताश झालेले लोक पाहून, समाजातील या लोकांसाठी आपण काहीतरी करावे, अशी मनोमन इच्छा निर्माण व्हायची.

त्यामुळे महसूल मधील पदाचे कायम आकर्षण होते. म्हणून त्याने जिद्दीने अभ्यास केला. याच जोरावर त्याने कर निरीक्षक, वनसेवा, राज्यसेवा अशा विविध परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांत अगदी थोडक्या गुणांनी अपयशास सामोरे जावे लागले. एखादे तरी पद हातात येईल अशी आशा असताना पदरी पुन्हा निराशा पडली. त्याने चूकातून वाट काढत यश मिळवले.इतकेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातून तो ११व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यास उपजिल्हाधिकारी हे पद मिळाले. माथाडी कामगाराचा मुलगा जेव्हा प्रशासकीय अधिकारी होतो. हे सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट ठरते.

Share This Article