स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी असून, लवकरच १७०० पेक्षा जास्त तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, खासगी कंपन्यांमार्फत होणाऱ्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता ही भरती थेट महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेतली जाणार आहे.
आतापर्यंत सरळसेवा अंतर्गत वेगवेगळ्या विभागांकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जात होत्या. यामध्ये एकूण ३३ विभागांमधील ११० आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत, ज्यांच्यासाठी १ हजार ४०० पेक्षा जास्त सेवाप्रवेश नियम आहेत. या परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतल्या जात असल्याने पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार होत असल्याची टीका सातत्याने होत होती.
विद्यार्थ्यांनी ही सरळसेवा भरती एमपीएससीकडे देण्याची जोरदार मागणी केली होती. अखेर सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एमपीएससीकडे ही भरती गेल्यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होईल, मात्र उमेदवारांची संख्या वाढून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.
या मेगाभरतीसाठी शासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक जिल्हा कार्यालयाकडून रिक्त जागांचे मागणी पत्र मागवण्यात येत आहे. जिल्ह्यानिहाय रिक्त जागांचा अंतिम अहवाल तयार होताच, एमपीएससीमार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि भरती प्रक्रिया अत्यंत वेगाने राबवली जाईल.







