Current Affair 05 February 2019

Published On: फेब्रुवारी 5, 2019
Follow Us

अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं. वयाच्या 70 व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भाटकर यांच्या घरी 03 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत.
त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

स्मृती मंधाना ठरली सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

भारताची गुणी उपकर्णधार स्मृती मंधा क्रिकेटपटूला आयसीसीचे मानाचे ‘सर्वोत्तम क्रिकेटपटू’ आणि ‘वनडेतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू’ असे दोन पुरस्कार लाभले आहेत. १२ वनडेंमध्ये ६६९ धावा, तर २५ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ६२२ धावांची बरसात, अशी खणखणीत कामगिरी करणारी डावखुरी सलामीवीर स्मृतीला ‘वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू’चा मान म्हणून रिचेल हेहोइ फ्लिंट पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
वनडेमध्ये ६६.९०च्या सरासरीने धावा, तर टी-२०मध्ये १३०.६७च्या स्ट्राइक रेटने धावांची टांकसाळ… अशी खणखणीत कामगिरी केल्याने स्मृती मंधानाची आयसीसीच्या या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली.
आयसीसीच्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार स्मृती वनडे रँकिंगमध्ये चौथ्या, तर टी-२० रँकिंगमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.
आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावणारी स्मृती ही भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी तेज गोलंदाज झुलन गोस्वामीने हा पुरस्कार जिंकला आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेला मान्यता

शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्याचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत 90 टक्के सूट देणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
म्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून निवासी किंवा अनिवासी गाळे, सदनिकांचे वाटप करण्यात येते. अशा सदनिकांसह मानीव अभिहस्तांतरणासाठी प्रलंबित असलेल्या नोंदणीकृतसहकारी गृहनिर्माण संस्थामधील निवासी सदनिका आणि निवासी वापरासाठीच्या स्थावर मालमत्तेच्या भाडेदारीच्या हस्तांतरणाचे दस्त योग्य मुद्रांकित केले नसल्यास दरमहा दोन टक्के दराने दंडआकारण्यात येतो. हा दंड मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या जास्तीत जास्त चार पट आकारला जातो.

शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग आंदोलन

शेतकरी संपाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील पुणतांबा गावात शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनजंय जाधव यांची कन्या निकिता तसेच सामाजिक कार्यकर्ता संजय जाधव यांची कन्या शुभांगी तसेच पूनम राजेंद्र जाधव ह्य तीन कन्यानी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे.
अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक महिला व शेतकऱ्यांच्या लेकीनी हजेरी लावली.

‘मोदी आधुनिक भारताचे युधिष्ठिर’

‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत युधिष्ठिर ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता गजेंद्र चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक भारतातील युधिष्ठिर म्हटलं आहे.
नि:स्वार्थपणे देशाच्या सेवा करणाच्या त्यांच्या वृत्तीमुळे मोदी युधिष्ठिर असल्याचं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं.
देशात जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा बऱ्याच गोष्टींची चर्चा होते. ‘उत्तर प्रदेशातील महाभारत, दिल्लीतील महाभारत…. प्रत्येक महाभारतात एका युधिष्ठिराची गरज असते. ज्या प्रकारे २०१४ मध्ये जनतेने मोदींना विजयी करत देशाची धुरा त्यांच्या हातात सोपवली होती त्याचीच आता पुनरावृत्ती होणार आहे. त्या महाभारतात युधिष्ठिराकडे हस्तिनापूराची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर या युगात भारताची जबाबदारी ही या आधुनिक दिवसांतील युधिष्ठिररुपी मोदींवर सोपवण्यात येणार आहे, जे या देशाची नि:स्वार्थ सेवा करत आहेत’, असं ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now