Current Affairs 08 january 2020
नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला आहे. हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पैलवान पुण्याच्या काका पवारांच्या तालमितील आहेत.
पुण्याच्या बालेवाडीत ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. कालच्या सामन्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे आज नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
‘ऑपरेशन मेघदूत’चे नायक ले. जनरल पी. एन. हून यांचे निधन

पाकिस्तानविरुद्ध १९८४च्या युद्धात महत्त्वाची भूमिका निभावणारे व ‘ऑपरेशन मेघदूत’चे नायक म्हणून ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून (पी. एन. हून) यांचे पंचकुला येथील रुग्णायलात सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पश्चिम कमांडचे प्रमुख असताना १९८७ मध्ये लेफ्टनंट जनरल हून लष्करातून निवृत्त झाले होते. दरम्यान, २०१३ मध्ये जनरल हून यांनी राजकारणात उतरत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
१९८४मधील भारत-पाकिस्तान युद्धात हून यांनी अत्यंत कुशलपणाने ‘ऑपरेशन मेघदूत’ची कमान सांभाळली. हे ऑपरेशन यशस्वी करत हून हे भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
लेफ्टनंट जनरल हून यांचा जन्म पाकिस्तानातील अॅबोटाबादमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अॅबोटाबाद सोडून भारतात वास्तव्याला आले.
जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीनमध्ये लेफ्टनंट जनरल हून यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी तिरंगा फडकावला होता. या मोहिमेलाच ऑपरेशन मेघदूत असे नाव देण्यात आले होते.
२०१९-२० मध्ये भारताचा जीडीपी ५% राहणार

नवी दिल्लीः आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मधील विकास दराबाबत वर्तवण्यात आलेला हा पहिलाच अंदाज आहे. तर, देशाचा जीव्हीए ४.९ टक्के राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या जीडीपी संदर्भातील आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
जून आणि सप्टेंबर महिन्यातील तिमाही आकलनानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर अनुक्रमे ५ टक्के आणि ४.५ टक्के राहिला. गेल्या सहा वर्षातील विकास दराचा हा सर्वांत नीचांकी आकडा आहे. गेल्या काही महिन्यांपासून जीडीपी दरात घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही देशाचा विकास दर ५ टक्के राहील, असे सांगितले होते.