⁠  ⁠

Current Affairs 12 April 2019

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

भारताची लोकसंख्या पोहोचली १३६ कोटींवर; वाढीचा दर चीनपेक्षा दुप्पट

  • भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • २०१९ मध्ये भारताची लोकसंख्या १३६ कोटींवर पोहोचली आहे. १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तत्पूर्वी १९६९ मध्ये ती ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. या अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.
  • देशाची ६ टक्के लोकसंख्या ६५ वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे.
  • देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष इतके आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.

पहिल्या टप्प्यात देशभरात मतदारांमध्ये उत्साह

  • लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात मतदारसंघांत गुरुवारी सरासरी ६२ टक्के मतदान झाले.
  • देशात सर्वाधिक म्हणजे ८१ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी म्हणजे ५० टक्के मतदान बिहारमध्ये झाले.
  • पश्चिम बंगालमध्ये ४२पैकी कूचबिहार आणि अलिपूरद्वार या दोन जागांसाठी ८१ टक्के मतदान झाले. देशातील हे यावेळच्या पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान आहे. त्याखालोखाल मणिपूरमध्ये ७८.२० टक्के, त्रिपुरात ७७.६ टक्के, आसाममध्ये ६८ टक्के, ओदिशात ६६ टक्के मतदान झाले.
  • उत्तर प्रदेशात ६४ टक्के, मेघालयात ६२ टक्के मतदान झाले. लक्षद्वीपमध्येही मतदानात २०१४च्या तुलनेत चांगलीच घट झाली. तेव्हा ८६ टक्के मतदान झाले होते, तर यंदा हे प्रमाण ६५.९ टक्के होते. अरुणाचलमध्येही मतदानात घटच झाली. २०१४मध्ये तेथे ८६ टक्के मतदान झाले होते, यंदा हे प्रमाण ६६ टक्के होते.
  • जम्मूत मतदानात वाढ झाली. यंदा ७२.१६ टक्के मतदान झाले. बारामुल्लात ३५.१ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा हे प्रमाण कमी आहे.

१०२ वर्षीय आजोबांचे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान

  • यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील राळेगाव येथील १०२ वर्षीय आजोबांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अनोखा विक्रम रचला.
  • पुखराज उमीचंद बोथरा (१०२) यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावला. या वयातही ते आपले राष्ट्रीय कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याबद्दल प्रशासनाने त्यांचा गौरव केला.
  • स्वतंत्र भारताच्या १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत पुखराज बोथरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

चार कोटींना विकले गेले नेपोलीयनचे प्रेमपत्र

  • फ्रान्सचा सम्राट नेपोलीयन बोनापार्ट याने आपली पत्नी एंप्रेस जेसोफेनला लिहलेल्या प्रेमपत्रांचा पॅरिसमध्ये लिलाव करण्यात आला. १७९६ ते १८०४ दरम्यान लिहिलेल्या या प्रेमपत्रांना ५,१३००० युरो म्हणजे ४ कोटी १८ हजार अशी विक्रमी किंमत मिळाली.
  • एकूण तीन पत्रांचा लिलाव करण्यात आला. १७९६ साली नेपोलिअन इटलीच्या मोहिमेवर असताना त्याने ही प्रेमपत्रे आपल्या पत्नीला लिहीली होती.
  • नेपोलियन आणि जेसोफेन यांचा विवाह मार्च १७९६ साली झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा देखिल लिलाव करण्यात आला होता
  • १७व्या शतकात त्यांची गाजलेली प्रेमकथा शेवटी मुल न झाल्याने १८०९ साली संपुष्टात आली.

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा सहज, सायनाचा संघर्षमय विजय

  • पी. व्ही. सिंधूने शानदार विजयासह सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. परंतु सायना नेहवालला दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पोर्नपावी चोचूवाँगविरुद्ध विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला.
  • पुरुषांमध्ये समीर वर्मा आणि किदम्बी श्रीकांतने आगेकूच केली आहे, तर पारुपल्ली कश्यपचे आव्हान संपुष्टात आले आहे.
  • डेन्मार्कच्या मिआविरुद्ध सिंधूने हा सलग दुसरा विजय संपादन केला.

पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला हिलरी शिष्यवृत्ती

  • रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या दीपा मलिकला तिच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल यंदाच्या वर्षीची न्यूझीलंड पंतप्रधानांकडून सर एडमंड हिलरी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • ४८ वर्षीय दीपाने २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमधील गोळाफेक (एफ ५३) प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. तिला ही शिष्यवृत्ती भारत आणि न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्नेहसंबंधात सुधारणा व्हावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने देण्यात येणार आहे.

आयडीबीआयची व्याजदरकपात

  • आयडीबीआय बँकेने कर्जांवरील व्याजदरामध्ये .५ टक्क्यांची कपात केली आहे.
  • यामुळे आयडीबीआयच्या एक वर्ष कालावधीच्या कर्जांवर आता नऊ टक्के व्याज आकारण्यात येईल. तर, सहा महिने व दोन वर्ष मुदतीच्या कर्जांवर ८.६ व ९.२५ टक्के दराने व्याज आकारणी होईल. एक महिन्यासाठीच्या कर्जावरील व्याजदरामध्ये .१० टक्क्यांनी कपात झाली असून या कर्जावरील नवा दर ८.१५ टक्के असेल.
  • रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये पाव टक्के कपात करून हा दर सहा टक्क्यांवर आणल्यानंतर स्टेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक आदींनी कर्जांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे.
Share This Article