Current Affairs 20 January 2020
उत्तराखंडमध्ये आता उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणारं रेल्वे स्थानकांची नावं
उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या स्थानकाच्या नावांच्या फलकामधील उर्दू भाषेतील नावाचा उल्लेख आता संस्कृत भाषेत केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हा बदल करण्यामागचे कारण सांगताना उत्तर रेल्वेने सांगितले की, संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याने हा बदल करण्यात आला असून तो नियमानुसारच आहे. सन २०१० मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याची घोषणा केली होती. हे निशंक आता केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री आहेत.
आता संपूर्ण उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकांवरील फलकांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि उर्दूऐवजी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत स्थानकांची नावं लिहिण्यात येतील. उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा ‘संस्कृत’ असल्याने रेल्वे स्टेशन्सवर उर्दूमध्ये लिहिलेल्या नावांना बदलून संस्कृतमध्ये करण्यात येणार आहे
उत्तराखंड राज्याची निर्मिती ९ नोव्हेंबर २००० मध्ये झाली तरी आजपर्यंत रेल्वे स्थानकांवरील नावं उर्दूमध्येच लिहिण्यात येत होती. कारण, यातील बहुतेक स्थानकांची नावं ही उत्तराखंड उत्तर प्रदेश राज्याचा भाग होते तेव्हापासूनची आहेत. उत्तर प्रदेशची दुसरी अधिकृत भाषा उर्दू आहे.
श्रीलंकेला भारताकडून ५ काेटी डाॅलर्सची मदत

भारताने श्रीलंकेला सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी ५ काेटी डाॅलर्स देण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाेभाल लंकेच्या दाैऱ्यावर आहेत. या भेटीत त्यांनी राष्ट्रपती गाेटाबाया राजपाक्षे यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा केली. त्यात संरक्षण, गुप्तचर व सागरी सुरक्षेच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
डाेभाल शनिवारी काेलंबाेला दाखल झाले. या भेटीत त्यांनी अनेक मुत्सद्यांचीहीदेखील भेट घेतली. द्विपक्षीय सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर माहिती, सागरी सुरक्षा इत्यादी मुद्दे दाेन्ही देशात चर्चिण्यात आले, अशी माहिती राष्ट्रपती राजपाक्षे यांनी ट्विट करून दिली. गुप्तचर पातळीवर तंत्रज्ञानविषयक देवाण-घेवाण ही बैठकीचे महत्त्वाचे सार आहे.
सागरी सुरक्षेच्या पातळीवर श्रीलंका, मालदिव, भारत यांचा एक गट तयार करण्यात येणार आहे. काेलंबाेला भेट देणारे डाेभाल हे उच्च पातळीवरील भारतीय अधिकारी असून त्यांचा हा दुसरा दाैरा आहे. या आधी त्यांनी नाेव्हेंबरमध्ये भेट दिली हाेती. २०१४ पासून केंद्रातील सरकारने उपखंडातील देशांना प्राधान्याने मदतीचे धोरण स्वीकारले आहे.
सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबागमध्ये

अलिबाग- सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबाग येथे आयोजित केले जाणार आहे. ८ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला कुरुळ येथील क्षात्रक्य समाज सभागृहात होणाऱ्या या संमेलनास देशभरातील शेतकरी साहित्यिक सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक भास्कर चंदनशिव असणार आहेत.
कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य आणि शेतकरयांची सांगड घालण्याच्या दृष्टीने या शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.
८७ दिवसांत ४,०३५ किमी धावून सुफिया खानची जागतिक विक्रमाची नाेंद
राजस्थानमधील अजमेरची अल्ट्रा धावपटू सुफिया खान. तिने ८७ दिवसांत ४,०३५ किमी धावून जागतिक विक्रमाची नाेंद केली अाहे. सुफिया गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत धावली अाहेे. देशातल्या २२ शहरांमध्ये जाऊन तेथील लाेकांना भेटायचे अाणि त्यांना बंधुता, एकता, शांतता आणि समानतेचा संदेश देणे हा यामागील हेतू होता.
अलीकडेच तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. १०० दिवसांत धाव पूर्ण करण्याचे लक्ष्य हाेते असे सोफियाने सांगितले. पण तिने हे लक्ष्य ८७ दिवसांतच पूर्ण केले.
Mumbai Marathon 2020 : इथिओपियाच्या धावपटूंनी मारली बाजी

प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा नेहमीप्रमाणेच यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही भाग घेतला होता.
या स्पर्धेत जवळपास ५५ हजार ३२२ धावपटू सहभागी झाले होते. यातील ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९ हजार ६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५ हजार २६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९ हजार ७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८ हजार ३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १ हजार २२ आणि अपंगांच्या शर्यतीत १ हजार ५९६ धावपटू सहभागी झाले होते.
आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत इथिओपिअन धावपटूंनी बाजी मारली. पुरुष गटातील पहिले तिनही क्रमांक इथिओपिअन खेळाडूंनी पटकावले. तसेच महिला गटातील पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर इथिओपिअन महिलांनी आपले नाव कोरले. मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर, २५ हजार डॉलर आणि १७ हजार अमेरिकी डॉलर्सचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पहिल्या तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे पाच लाख, चार लाख आणि तीन लाख रुपये बक्षिस स्वरुपात देण्यात आले.















