⁠  ⁠

चालू घडामोडी – २२ एप्रिल २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read
देश-विदेश

उत्तराखंडमध्ये २७ पर्यंत राष्ट्रपती राजवट
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २७ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने भाजपला बेकायदेशीर मार्गाने सरकार स्थापन करण्यापासून रोखले गेल्याची प्रतिक्रिया हरिश रावत यांनी व्यक्त केली आहे. या अंतरिम आदेशाने राष्ट्रपती राजवट न्यायालयाच्या आदेशाशिवाय उठवता येणार नाही ही निकालाची चांगली बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एक मे रोजी मोफत गॅसजोड
येत्या एक मे पासून दारिद्रय रेषेखालील ५ कोटी लोकांना एलपीजी म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसचे जोड मोफत दिले जाणार आहेत. आठ हजार कोटी रुपये खर्च करून ही योजना राबवण्यात येत आहे. एकूण १.१३ लोकांनी एलपीजीचे अनुदान सोडले असून त्या पैशातून हे गॅस जोड दिले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या यी महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात एक मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात केली जाईल. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ ही १ मे रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथून सुरू केली जाणार आहे व तसाच कार्यक्रम गुजरातेत दाहोद येथे पंधरा मे रोजी होणार आहे. वार्षिक दहा लाख उत्पन्न असलेल्या किंवा सधन लोकांनी गॅसचे अनुदान सोडून द्यावे त्यातून गरिबांच्या घरी गॅस देता येईल असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते.

अग्निबाणातील एरोजेल रोजच्या वापरात आणणार
अवकाश संशोधनाचे आपल्या रोजच्या जीवनात अनेक उपयोग असतात. प्रत्यक्षात आपण ज्या वस्तू वापरत असतो त्यात अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो, पण आपल्याला ते जाणवतही नाही. विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तयार केलेले निळ्या रंगाचे उष्णतारोधक म्हणून वापरले जाणारे एरोजेल आता सनिकांसाठी हलक्या वजनाचे जॅकेट व बूट तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे. या जेलचा वापर वातावरणातील उष्णतेने अग्निबाणाच्या पहिल्या टप्प्यातील इंजिने पेटू नयेत यासाठी सध्या केला जातो.

महाराष्ट्र

राज्यात १.५५ कोटी ‘एलईडी दिव्यां’चा झगमगाट
वीज बचतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने राज्यातील महावितरणच्या १ कोटी ६९ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात आतापर्यंत १ कोटी ५५ लाख ‘एलईडी दिव्यां’ची विक्री झाली असून, त्याचा झगमगाटाने राज्यातील घरे उजळली आहेत. यात ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्य़ाने बाजी मारली असून, राज्यात सर्वाधिक १३ लाख १० हजार दिवे वितरित करण्यात आले आहेत.

क्रीडा

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावरील दंड माफ
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाला 41.97 दशलक्ष डॉलरचा दंड माफ केला आहे. ऑक्‍टोबर 2014 मध्ये विंडीज संघाने भारत दौरा अर्धवट टाकल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. उर्वरित मालिका संघ पुढील वर्षी पूर्ण करेल, अशी तयारी विंडीज मंडळाने दर्शविली.

अर्थव्यवस्था

विकासदर ७.८ टक्के अपेक्षित
भांडवली खर्चात वाढीची अर्थसंकल्पीय तरतूद, यंदा अपेक्षित असलेला सामान्य मान्सून आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हे घटक भारताच्या आर्थिक विकास दराला ७.८ टक्क्य़ांच्या पातळीपर्यंत पोहोचविण्यास मदत करतील, असा विश्वास नोमुराने शुक्रवारी आपल्या अभ्यास टिपणांत व्यक्त केला. कालच फ्रेंच वित्तीय सेवा समूह बीएनपी परिबाने चालू आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था आठ टक्के दराने प्रगती साधेल, असे भाकीत केले आहे.

यंदा निर्गुतवणुकीसाठी सरकार लवकर सक्रिय!
गेली काही वर्षे प्रत्येक सरकारला निर्धारित लक्ष्य गाठण्यात अपयश आलेल्या निर्गुतवणूक प्रक्रियेसाठी यंदा सरकारने आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासून सक्रियता दाखविली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची आणि लोह खनिज उत्पादनांतील देशातील सर्वात मोठी कंपनी एनडीएमसीमधील सरकारच्या १० टक्केहिश्शाच्या खुल्या विक्रीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या चार र्मचट बँकर्सच्या चाचपणीचे काम सरकारने शुक्रवारी सुरू केले.

TAGGED:
Share This Article