कुलभुषण जाधव आणि बलुचिस्तान

Published On: नोव्हेंबर 11, 2017
Follow Us
kulbhushan_jadhav

भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पत्नीची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी असलेले जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

जाधव यांना फाशी सुनावल्यानंतर भारताने १६ वेळा जाधव यांची भेट घेण्यासाठी विनंती केली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय दबावही वाढला होता. आता पत्नीची भेट घेण्यासाठी पाकिस्तान विशेष व्यवस्था करेल. जाधव यांच्यावर दहशतवादी कारवायांसह हेरगिरी केल्याचा आरोप पाकने ठेवला आहे. हे आरोप भारताने फेटाळले असून फाशीच्या शिक्षेविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. पाक व्हिएन्ना करारचे उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद भारताने केला होता. यानंतर फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. तेथे भारतातर्फे प्रसिध्द वकिल हरिष साळवे यांनी आक्रमकपणे बाजू मांडल्यानंतर पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाधव यांना बलुचिस्तान प्रांतात हेरगिरी करतांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वांमध्येच बलुचिस्तानबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिन लालकिल्ल्यावर केलेल्या भाषणा बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. यामुळे बलुचिस्तानबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

सध्याचे बलूचिस्तान म्हणजे अखंड भारतातील मीर अहमद यांचे ‘कलात’ संस्थान होय. फाळणीच्या वेळी तेथे ब्रिटिशांच्या आधिपत्य होते. ‘कलात’ ने पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिल्यानंतर. मार्च १९४८ मध्ये पाकने लष्कर पाठवून विलीनीकरणाच्या करारावर तत्कालीन शासक यार खानची सही घेतली होती, पण त्यांच्या भावांनी संघर्ष सुरूच ठेवला होता. सध्याच्या बलूच आंदोलनाची मुळे तेव्हांपासूनची आहेत. ती १९६६ मध्ये अधिकच घट्ट झाली. भौगोलिकदृष्ट्याही बलुचिस्तानला प्रचंड महत्व आहे कारण पाकिस्तानच्या ४४ टक्के भागात पसरलेल्या बलुचिस्तानची लोकसंख्या तब्बल १३ लाख इतकी आहे. या बलुचिस्तानचा भारताशी विशेषत: महाराष्ट्राशी फार जुना संबध आहे. दुसर्या पानिपतच्या युध्दानंतर अहमदशहा अब्दाली अफगणिस्तानला जाण्यासाठी निघाल्यानंतर त्याने सोबत २२ हजार मराठी युध्दकैदींना सोबत घेतले होते. वाटेत लागणार्या बलुचिस्तानच्या डेरा बुगटी प्रांताच्या शासकांना अनेक मराठा युध्दकैदी सोपविण्यात आल्याची इतीहासात नोंद आहे. यावेळी मीर नासीर खान या शासकाने मराठा युद्धकैदींना काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून दिले होते आजही हा समाज काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो.
बलुचिस्तानच्या मुद्यावरुन पाकिस्तानचा एवढा तिळपापड होण्याचे दुसरे कारण म्हणजे, बलुचिस्तानमध्ये गॅस, युरेनियम, तांबे, सोने आणि इतर धातूंचा मोठा साठा आहे. त्याच्या वायू साठ्यांतून अर्ध्या पाकिस्तानची गरज भागते. मध्य आशियात प्रवेशासाठी चीन ज्या ग्वादर बंदराची निर्मिती करत आहे ते येथेच आहे. इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइनही येथूनच जाते. शांतता असली तरच हे प्रकल्प शक्य आहेत. बलुचिस्तान प्रांतातल्या ग्वादार बंदराच्या विकासासाठी पाकिस्तानने चीनशी करार केल्यामुळे भारताच्या बंगालच्या उपसागरातल्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाबहार बंदराचा विकास करण्यासह तेथून अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत रस्ते आणि रेल्वे मार्ग बांधण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पासाठी भारत ५०० दशलक्ष डॉलर्सची मदत करणार आहे. हा देखील एका कुटनितीचा भाग आहे. भारताचे हे आक्रमक डावपेच आपल्याला परवडणार नाहीत. याची जाण पाकिस्तानला आहे. चहूबाजूने होणार्या कोंडीमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे.

काश्मीर प्रश्‍नावर गेल्या ७० वर्षांपासून भारत लढा देत आहे. मात्र वाकडी शेपूट असलेला पाकिस्तान काश्मीरवर दावा करत नेहमीच वातावरण चिघळवित आहे. इतक्या वर्षांच्या या संघर्षाला बलुचिस्तानच्या निमित्ताने प्रथमच कलाटणी मिळाली. बलुचिस्तानच्या रूपाने काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा अस्तित्वात असून त्याच्यावर तोडगा निघणे बाकी आहे, ही बाब भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदारपणे मांडली आहे. भारताच्या या नव्या रणनितीमुळे जो पाकिस्तान काश्मीरवर हक्क सांगत होता तो आता बलुचिस्तान वाचविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे! भारताची ही आजवरची सर्वोकृष्ट कुटनिती मानली जात आहे.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now