⁠  ⁠

MPSC Daily Current Affairs 2 January 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

1) सुमीत मलिक बनणार नवे मुख्य माहिती आयुक्त

राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक हे आता नवीन मुख्य माहिती आयुक्त बनणार आहे. ते लवकरच या पदाची शपथ घेणार आहेत. गतवर्षी १ जूनला माजी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांची कारकीर्द संपुष्टात आल्यापासून मुख्य माहिती आयुक्तपद रिक्त होते.

2) सुरेश प्रभू, कमल हसन यांचे हार्वर्ड संमेलनात भाषण

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि अभिनेता कमल हसन यांच्यासह अनेक प्रतिष्ठित भारतीय जगभरात नावाजलेल्या अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये आयोजित १५ व्या वार्षिक भारतीय संमेलनाला संबोधित करतील. १० आणि ११ फेबु्रवारी रोजी हे संमेलन होणार आहे. हार्वर्डमध्ये होणाऱ्या भारतीय संमलेनासाठी ‘इंडिया डिसरप्टिक इनोव्हेंशस’ असा विषय ठेवण्यात आला आहे. संमलेनाच्या विचारमंचावरून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पंजाबाचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि अभिनेता कमल हसन आपले विचार व्यक्त करतील.

3) सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्याना दंड: महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश

राज्यातील प्रत्येक ठिकाण स्वच्छ राहावे यासाठी राज्य सरकारकडून नुकताच एक अध्यादेश काढण्यात आला आहे. यानुसार अ, ब वर्गातील महापालिका आणि नगर परिषदांच्या हद्दीतील रस्त्यांवर घाण केल्यास १८० रुपयांचा दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये, उघड्यावर लवघी केल्यास २०० रुपयांचा दंड, तर शौच केल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. हे दंड आकारून त्याची वसुली करण्याचे अधिकार महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. याच धर्तीवर क, ड वर्गातील महापालिका आणि नगर परिषदांच्या हद्दीत कचरा केल्यास १५० रुपयांचा दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपयांचा दंड, उघड्यावर लघवी केल्यास १०० रुपयांचा दंड आणि उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

4) आसाम : ३.२९ कोटी अर्जांपैकी १.९ कोटी नागरिकांना भारतीयांचा दर्जा

आसाम सरकारने राज्यातील अधिकृत नागरिकांची पहिली यादी जारी केली. यात आसाममधील एकूण ३.२९ कोटी अर्जांपैकी १.९ कोटी नागरिकांना भारतीयांचा दर्जा देण्यात आला असून, उर्वरित अर्जांची विविध टप्प्यांवर छाननी केली जात आहे. या प्रक्रियेद्वारे आसाममधील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९५१ च्या जनगणनेनुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे. ‘प्रस्तुत मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तयार करण्यात आला असून, मसुद्याचा पुढील भाग एप्रिल महिन्यातील सुनावणीनंतर जारी केला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया चालू वर्षातच पूर्ण केली जाईल,’ असेही आरजीआय यांनी यावेळी स्पष्ट केले. सदर प्रक्रिया मे २०१५ मध्ये सुरू झाली होती. त्यात संपूर्ण आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबांकडून ६.५ कोटी दस्तावेज प्राप्त झाले होते.

5) स्टेट बँक ऑफ इंडियाची जुनी कर्जे स्वस्त

स्टेट बँक ऑफ इंडियाची जुनी कर्जे स्वस्त झाली आहेत. बँकेने १ जानेवारीपासून बेस रेट ८.९५%वरून ८.६५% केला आहे. हा दर इतर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. यामुळे २० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा ईएमआय सुमारे ३८४ रुपयांनी कमी होणार आहे. एप्रिल २०१६ पासून एमसीएलआर पद्धत सुरू होण्याआधी कर्जांवरील व्याज हे बेस रेटनेच ठरवले जात होते. बँकांच्या निधी उभारणीशी निगडित एमसीएलआरमध्ये बदल करण्यात आलेला नाही. एका वर्षाचा एमसीएलआर ७.९५% आहे. म्हणजे एप्रिल २०१६ नंतर कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय कमी होणार नाही. याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने २८ सप्टेंबरला बेस रेट ०.०५% घटवला होता. बँकांनी व्याजदरात किंचित कपात केल्याने रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदवला होता. डिसेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपोदरात १.७५% कपात केली आहे. तुलनेत बँकांनी बेसरेटमध्ये सरासरी ०.६० टक्केच कपात केली आहे.

6) प्रजासत्ताकदिनी राजपथावर शिवराज्याभिषेक चित्ररथ

यंदा प्रजासत्ताकदिनी राजपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्राकडून शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर १४ राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होतील. देशभरातून एकूण ३० राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला जात असून या चित्ररथाच्या बांधणीचे कार्य येथील कँटोनमेंट भागातील रंगशाळेत सुरू आहे. चित्ररथावर रायगड किल्ल्यावर असलेली मेघडंबरी उभारण्यात येणार असून शिवराज्याभिषेक दर्शवण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण १० कलाकार असतील. चित्ररथाच्या दाेन्ही बाजूला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा दर्शवण्यात येणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या गीताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे. यापूर्वी १९८० मध्येही राज्याच्या वतीने शिवराज्याभिषेक दर्शवणारा चित्ररथ प्रदर्शित केला होता यास प्रथम पारितोषिक मिळाले होते. १९८३ मध्ये बैलपोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर १९९३ ते १९९५ असा सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.

7) ८४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विदर्भ रणजी चॅम्पियन

रणजी स्पर्धेच्या ८४ वर्षांच्या इतिहासात विदर्भ संघाने प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गेल्या ६१ वर्षांपासून विदर्भाचा संघ या स्पर्धेत खेळत अाहे. यंदा त्यांनी सात वेळच्या चॅम्पियन दिल्ली संघाचा ९ गड्यांनी दणदणीत पराभव केला. फायनलमध्ये हॅट्ट्रिकसह एकूण अाठ बळी टिपणारा नागपूरचा युवा गाेलंदाज रजनीश गुरबानी सामनावीर ठरला. वाडकर (१३३), अादित्य सरवटे (७९) व नेराळच्या (७४) अर्धशतकामुळे विदर्भाने पहिल्या डावात दिल्लीसमाेर ५४७ धावांचा डाेंगर रचला. त्यानंतर दिल्लीचा दुसरा डाव २८० धावांतच गुंडाळला. माफक २९ धावांचे लक्ष्य विदर्भाने एका गड्याच्या माेबदल्यात अवघ्या ५ षटकांत गाठले. गेल्या ८४ वर्षांपासून सुरू असलेल्या रणजी ट्राॅफी स्पर्धेत विजय मिळवणारा विदर्भचा संघ हा १७ वा विजेता ठरला. पराभूत दिल्लीने अाजवर सात वेळा स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले हाेते.

Daily Marathi Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Share This Article