⁠  ⁠

राज्यातला 36 वा जिल्हा पालघर

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read

१ ऑगस्टला ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.

ठाणे जिल्ह्याचं विभाजन करुन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारनं १३ जून रोजीच घेतला होता. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी जिल्हा विभाजन करण्याची मागणी गेली 30 वर्ष सुरू होती. ठाणे जिल्ह्याचा विस्तार बराच मोठा असून दुर्गम भागातील आदिवासी जनतेपर्यंत सोयी सुविधा पोहचवणे आणि दुर्गम भागातील जनतेला छोटय़ा मोठया कामासाठी मुख्यालयात येण्याकरिता जवळपास दीडशे किलोमीटरचे अंतर कापावे लागत असे.

पालघर जिल्ह्यात आठ तालुके असतील, त्यात तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई. जव्हार, मोखाडा आणि तलासरी हे तीन तालुके 100 टक्के आदिवासी आहेत. जिल्ह्यात वसई-विरार ही महानगरपालिका तर डहाणू, पालघर, जव्हार या नगरपालिका असतील. जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल ५,३४४ चौरस किलोमीटर, तर लोकसंख्या आहे तीस लाखांच्या जवळपास. या नव्या जिल्ह्याला एक खासदार आणि सहा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहेत. देशातील पहिलं अणुऊर्जा केंद्र हे याच जिल्ह्यातल्या तारापूर इथं आहे. इथून १४०० मेगावॅटची वीज निर्मिती होते. याशिवाय डहाणूत रिलायन्स एनर्जीचं औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. बोईसर, पालघर, वाडा आणि तलासरी इथं उद्योगधंदेही येऊ लागले आहेत. आता यापुढे औद्योगिक विकासासोबतच कृषी विकासाला चालना मिळेल.

ठाणे जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाच्या मानाने पालघर जिल्हा मोठा आहे. विभाजनानंतर ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4 हजार 241 तर पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5 हजार 766 इतके आहे. पालघर जिल्ह्यात पालघर हा एकमेव लोकसभा मतदार संघ तर ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी असे लोकसभेचे 3 मतदार संघ आहेत. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 तर पालघरमध्ये 6 मतदार संघ आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 956 गावे आहेत. पालघरचे सरासरी पर्जन्यमान 2 हजार 468 एवढे आहे. तांदूळ, गहू, मका, वरी, नाचणी, कुळीथ, वाल, चवळी, मिरची, आंबा, केळी, चिकू हे येथील प्रमुख पिके आणि फळे आहेत.
palghar map
पालघर जिल्ह्याची व्याप्ती
जिल्हा क्षेत्र – वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, वाणगाव, कासा, चिंचणी, बोर्डी, तलासरी ते गुजरात सीमा, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा.
मुख्यालय – पालघर
लोकसंख्या – सुमारे 30 लाख
क्षेत्रफळ – सुमारे साडेपाच हजार चौ. किलोमीटर

पालघर जिल्हा निर्मितीचा इतिहास

  • १९८९ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांकडून विभाजनाचे सुतोवाच
  • जिल्ह्याचं मुख्यालयावरुन वाद रंगल्यानं विभाजन रेंगाळलं
  • विभाजनाऐवजी त्रिभाजनाची मागणी पुढे आली
  • १९९४ साली गो.बा. पिंगुळकर समिती, 2012 साली विजय नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • पिंगुळकर आणि नाहटा समितीनं जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी पालघरची शिफारस केली

 

TAGGED:
Share This Article