⁠  ⁠

Current Affairs 25 & 26 February 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

1) 4-जी विस्तारात भारत जगात 14 व्या स्थानी

४-जीच्या विस्तारात भारत जगात १४ व्या स्थानी असला तरी वेगात मात्र ८१ वा क्रमांक आहे. विस्तार व वेग दोन्ही बाबतीत दक्षिण कोरिया प्रथमस्थानी आहे. ४-जीच्या वेगात घाना (४.८१ एमबीपीएस), सौदी अरेबिया (५.२८ एमबीपीएस) आणि इराणही (५.८१ एमबीपीएस) भारताच्या पुढे आहेत. अहवालानुसार, भारतात ४-जीच्या कमी वेगाचे कारण महागड्या एअरवेव्हज हे आहे. तुलनेत अंडरग्राउंड केबल स्वस्त व प्रभावी पर्याय ठरू शकतात. वायफायवर सर्वाधिक वेळ घालवण्यात नेदरलँडचे युजर्स आघाडीवर आहेत. येथील लोक दिवसातील ६८.५३% वायफाय वापरतात. दुसऱ्या स्थानी चीन (६५.४२%) व तृतीय स्थानी जर्मनी (६१.४४%) आहे. भारताती युजर्स दिवसातील १८.९०% वेळ वायफाय वापरतात. इतर वेळी ते मोबाइल डेटाच वापरतात.

2) आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला मोठा झटका

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका बसला आहे. दहशतवादी संघटनांना निधी पुरवणा-या देशांवर नजर ठेवणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकलं आहे. याचा अर्थ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर नजर ठेवली जाणार आहे. पाकिस्तानसाठी हा अजूनही मोठा झटका आहे कारण प्रत्येक परिस्थितीत त्यांची साथ देणा-या चीनने यावेळी मात्र त्यांना समर्थन दिलं नसून या मुद्द्यावर माघार घेतली आहे. चीनने आधी या प्रस्तावावर आक्षेप घेतला होता, मात्र नंतर विरोध मागे घेतला. यानंतर सर्वसहमतीने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या FATF च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

3) देशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी

समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या मानवरहित ड्रोनची दुसऱी चाचणी यशस्वी झालीये. डीआरडीओनं या ड्रोनची निर्मिती केलीये. हा ड्रोन एकावेळी 24 तासांपर्यंत उड्डाण करु शकतो. या ड्रोनमुळे शत्रूवर करडी नजर ठेवण्यासोबतच शत्रूवर हल्ला करण्याचीही क्षमता आहे. या ड्रोनचं इंजिन उच्च क्षमतेचं आहे. चित्रदुर्गावर या ड्रोननं प्रथम यशस्वी उड्डाण केलं.

4) आयसीसी कसोटी अजिंक्यपद भारताकडे

आयसीसी कसोटी क्रमवारीतील सांघिक यादीमध्ये अव्वल स्थान गाठल्याबद्दल प्रतिष्ठेची कसोटी अजिंक्यपदाची गदा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. यासह भारतीय संघाला दहा लाख अमेरिकन डॉलरचे इनाम देण्यात आले. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवला आहे. याचाच अर्थ ऑक्टोबर २०१६पासून भारतीय संघ कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावर विराजमान आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नोव्हेंबर २००९ ते ऑगस्ट २०११ या कालावधीत कसोटी अग्रस्थानावर होता. तो भारतीय संघाचा सर्वात जास्त कालावधी होता. कोहली आणि धोनीशिवाय स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ (सर्व ऑस्ट्रेलिया), अँडय़ू स्ट्रॉस (इंग्लंड), ग्रॅमी स्मिथ, हशिम अमला (दोघेही दक्षिण आफ्रिका) आणि मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) या कर्णधारांनी कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकली आहे.

5) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : अमित पांघलने सुवर्णपदक जिंकले

अमित पांघलने स्ट्रँडजा स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची नोंद केली. मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पाच वेळा जिंकणाऱ्या भारताच्या एम. सी. मेरी कोम आणि सीमा पूनिया यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या महिन्यात इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धा जिंकण्याची किमया साधणाऱ्या अमितने ४९ किलो गटात मोरोक्कोच्या सईद मोर्दाजीला नमवले. हरयाणाच्या २३ वर्षीय अमितने उंच्यापुऱ्या प्रतिस्पध्र्याची तमा न बाळगता हा विजय मिळवला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेरीला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत यजमान देशाच्या सेव्हदा अ‍ॅसेनोव्हाकडून पराभव पत्करावा लागला. सीमा पूनियालाही सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. ८१ किलोवरील गटात रशियाच्या अ‍ॅना इव्हानोव्हाने सीमावर विजय मिळवला. मेरी कोमसाठी हा धक्कादायक निकाल ठरला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने आक्रमक खेळ करताना अ‍ॅसेनोव्हावर वर्चस्व गाजवले होते. मात्र स्थानिक प्रतिस्पर्धीने चतुराईने खेळ करताना गुणांची कमाई केली. दुसरीकडे इव्हानोव्हाने सहजपणे सीमावर मात केली. भारतीय महिलांनी सहा पदके मिळवली. मीना कुमारी देवी (५४ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), स्वीटी बुरा (७५ किलो) व भाग्यबती कचारी (८१ किलो) यांनी कांस्यपदकांची कमाई केली.

6) बॉलिवूडची ‘चांदनी’ निखळली ; बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचं निधन

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. भाचा मोहित मारवाहच्या लग्नाच्या निमित्ताने श्रीदेवी त्यांच्या कुटुंबीयांसह दुबईत गेल्या होत्या. तेथे त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असे कुटुंब आहे. श्रीदेवीने 1975 मध्ये फिल्म ‘जूली’तून डेब्यू केले होते. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसल्या होत्या. 1983 मध्ये आलेल्या ‘हिम्मतवाला’ने श्रीदेवीला रात्रीतून स्टार बनवले होते. श्रीदेवी शेवटी ‘मॉम’ या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म 7 जुलै 2017 ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी 2012 साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. – श्रीदेवीने प्रोड्यूसर बोनी कपूरशी लग्न केले होते. श्रीदेवीने ‘सोलहवां सावन’ (1978), ‘हिम्मतवाला’ (1983), ‘मवाली’ (1983), ‘तोहफा’ (1984), ‘नगीना’ (1986), ‘घर संसार’ (1986), ‘आखिरी रास्ता’ (1986), ‘कर्मा’ (1986), ‘मि. इंडिया’ (1987) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.

7) सरकारी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक अभिनय

भाजपा सरकारने मुंबईतील नद्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘मुंबई रिव्हर अँथम’ तयार केले आहे. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी हे रिव्हर अँथम गायले आहे. याशिवाय, या अँथममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर ‘रिव्हर अँथमच्या’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. यु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

Share This Article