⁠  ⁠

Current Affairs 6 April 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 3 Min Read
3 Min Read

1) फेसबुककडून 5.62 लाखांहून जास्त भारतीयांचा डेटा लीक

ब्रिटनची राजकीय कन्सल्टन्सी कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाने ८ कोटी ७० लाखांहून जास्त फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा चुकीचा वापर केल्याची कबुली नेटवर्किंग साइट फेसबुकने दिली आहे. यामध्ये ५.६२ लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा समावेश आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, अॅप इन्स्टॉलेशनद्वारे भारतात ३३५ लोकांचा डेटा थेट लीक झाला. अन्य ५,६२,१२० लोक त्यांचे “फ्रेंड्स’ असल्यामुळे परिणाम झाला. अशा पद्धतीने एकूण ५ लाख ६२ हजार ४५५ भारतीयांचा डेटा लीक झाला. फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माइक श्रोएफर यांनी कॉर्पोेरेट ब्लॉगमध्ये डेटा लीकशी संबंधित आकडेवारी सार्वजनिक केले. फेसबुकने प्रथमच आकडेवारीसोबत डेटा लीकची माहिती दिली.

2) सुरक्षा परिषदेच्या अतिरेकी यादीत दाऊद, हाफिजसह 139 पाकिस्तानींचा समावेश

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने अतिरेकी व अतिरेेकी संघटनांची नवी यादी जारी केली. त्यात मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेसह १३९ नावे पाकिस्तानमधील आहेत. भारताचा ‘मोस्ट वाँटेड’ दाऊद इब्राहिमच्या नावाचाही यादीत समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार, दाऊदकडे अनेक नावांनी पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. हे पासपोर्ट रावळपिंडी व कराचीतून जारी झाले आहेत. पाकिस्तानमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर अयमान अल जवाहिरीचे नाव आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाचे नेतृत्व त्याच्याकडे आले आहे. जे पाकिस्तानमध्ये राहत आहेत किंवा तेथून संचालित होत आहेत किंवा पाकिस्तानच्या जमिनीचा दहशतवादी कारवायांसाठी करणाऱ्या संघटनांशी संबंधित आहेत अशांची नावे या यादीत समाविष्ट आहेत.

3) बँक खाते, ई-वॉलेटमधून बिटकॉइन खरेदीवर रिझर्व्ह बँकेने घातली बंदी

बँकांनी बिटकॉइनसारख्या डिजिटल चलनाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांचा व्यवहार तत्काळ बंद करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. हे निर्देश ई-वॉलेटवरदेखील लागू होतील. म्हणजेच ई-वॉलेट किंवा बँक खात्याच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती बिटकॉइनची खरेदी करून शकणार नाही. रिझर्व्ह बँक स्वत:चे डिजिटल चलन तयार करण्याचाही विचार करत आहे. याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती जूनपर्यंत अहवाल देणार आहे.

4) वन्य हत्तींपासून शेतपिकांशिवाय मालमत्तेची हानी झाल्यासही भरपाई

राज्यातील वन्यहत्तींपासून शेतपिकांव्यतिरिक्त अन्य मालमत्तेची हानी झाल्यासही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेती अवजारे आणि उपकरणे तसेच बैलगाडीचे नुकसान झाल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा ५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल. याशिवाय संरक्षक भिंत आणि कुंपण याचे नुकसान झाल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article