⁠  ⁠

आईच्या कष्टाचं पांग फेडलं; वैभव गुंजाळ बनला PSI अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC PSI Success Story अत्यंत डोंगराळ भाग, जेमतेम शेती त्यात पूर्णपणे शेतकरी कुटूंब….यात वडिलांचे आकस्मिक निधन यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईने मोलमजुरी करून पेलली. ही परिस्थिती सुधारायची असेल तर लवकरात लवकर अधिकारी होणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन वैभव गुंजाळने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तसेच त्याला शालेय जीवनापासून पोलिस खात्याचे आणि वर्दीचे आकर्षण होते. हेच ध्येय मनाशी बाळगून त्याने स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू केला.

सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी गावात राहणारा वैभव गुंजाळ. वैभवचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने तालुक्याची वाट धरली. बारागाव पिंप्रीला जाऊन दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे लवकरात लवकर नोकरी मिळावी, या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग करण्याचे ठरविले. त्यानुसार संगमनेर येथील महाविद्यालयात ‘मॅकेनिकल इंजिनिअर’ क्षेत्र निवडले. चार वर्षांची डिग्री घेऊन चांगल्या गुणांनी तो उत्तीर्णही झाला. मात्र, वैभवला पोलीस सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न काही स्वस्थ बसू देत नव्हते.

याच दरम्यान २०१९ला वैभवच्या वडीलांचे आकस्मित निधन झाले.ह्या शेतकरी कुटुंबातील सर्व जबाबदारी आई मनिषा गुंजाळ यांनी उचलली. तीन मुलांना आई मनिषा गुंजाळ ने मोलमजुरी करून शिकवले. मुलांनी स्व-बळावर कॅरिअरच्या वाटा शोधल्या. यातील मोठ्या मुलाने म्हणजे वैभवने वर्दी मिळवण्याचा ध्यास घेतला. कोरोनाच्या या काळात कोणत्याही परीक्षा होत नव्हत्या.

त्या दिवसांचा उपयोग करून घेऊन त्यांनी अतिशय नियोजन पद्धतीने अभ्यास सुरूच होता. सुरुवातीला ‘पीएसआय’ पदाची त्याने परीक्षा दिली. त्यात पहिल्याच प्रयत्नात ‘प्रीलिम्स’ आणि ‘मेन्स’ हे दोन्ही महत्त्वाचे टप्पे त्याने पार केले. शेवटी मुलाखतीची तयारीदेखील चांगली झाल्याने ‘पीएसआय’ पदाला वैभवने गवसणी घातली.मेकॅनिकल इंजिनिअर ते पीएसआय हा वैभवचा प्रवास गावातील अनेकांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

Share This Article